जालना : ‘महिलांनी संघटित होण्याबरोबरच कौशल्यावर आधारित प्रशिक्षण घेऊन सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा आणि आपल्या कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावावा,’ असे आवाहन भोकरदन विभागाचे उपविभागीय अधिकारी हरिशचंद्र गवळी यांनी केले.
भोकरदन तालुक्यातील राजूर (गणपतीचे) येथे जालना जिल्हा माहिती कार्यालय, कै. श्रीरंगराव बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व सहारा युवा क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भोकरदन तालुक्यातील बाणेगाव, चांदईएक्को, चांदई टेपले, चांदई ठोंबरे, लोणगाव आदी गावातील ग्रामस्थांसाठी आयोजित ‘ग्रामसंवाद’ या कार्यक्रमात गवळी बोलत होते.
या वेळी भोकरदनच्या तहसीलदार श्रीमती रूपा चित्रक, औरंगाबादच्या बळीराजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष व औरंगाबाद उच्च न्यायालयातील विधिज्ञ ॲड सा. मा. पंडित, राज्य महिला आयोगाचे तालुका समन्वयक ॲड. पी. जे. गवारे, राजूरचे सरपंच मुसासेठ सौदागर, विस्तार अधिकारी सूर्यवंशी, बी. एस. सय्यद, माहिती सहायक अमोल महाजन, राजूर संस्थानचे गणेश साबळे, तायडे, राजेंद्र भिंगारे, शिवाजी तायडे, श्रीमती मापारी आदी उपस्थित होते.
‘महिला बचत गटांच्या माध्यमातून विविध उद्योगांसाठी बँकांच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. या कर्जाच्या आधारावर महिलांनी छोटे-छोटे व्यवसाय उभारावेत. कर्जप्रकरणात काही अडचणी आल्यास थेट आमच्याशी संपर्क साधावा,’ असे गवळी यांनी सांगितले.
तहसीलदार चित्रक म्हणाल्या, ‘ग्रामीण भागातील महिलांनी चूल आणि मूल एवढ्यापुरते मर्यादित न राहता बदलत्या युगात कौशल्यावर आधारित प्रशिक्षण घेऊन स्वावलंबी होण्याची गरज आहे. ग्रामीण भागातील महिलांचा विकास झाला, तरच खऱ्या अर्थाने आपल्या देशाचा विकास होईल. यासाठी महिलांनी सरकारच्या योजनांचा लाभ घेऊन आपला आर्थिक स्तर उंचावावा.’